इतिहासातील प्रसिद्ध खरड्याची लढाई

खर्डा एक ऐतिहासिक शहर.
इतिहासातील प्रसिद्ध खरड्याची लढाई

हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी लढाई झाली. त्यात मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील शिर्डी-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा हे गाव ऐतिहासिक वास्तुचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातून नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला भुईकोट किल्ला प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो.
महादजी शिंदे यांचे वारस दौलतराव शिंदे यांच्याशी नाना फडणवीसांचे संबंध सुधारलेले होते आणि शिंद्यांची विशाल सेना पुणे येथे असल्याने त्याचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नानांनी ठरविले आणि हैदराबादच्या निजामावर लक्ष केंद्रीत करुन त्याच्याकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली. निजामाचा मंत्री मुशीर मुल्कने ही चौथाईची मागणी फेटाळून लावतानाच भोसल्याचा वऱ्हाडातील महसुलावरील अधिकारही नाकारला. परिणामी पेशवा, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च, इ.स. १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली. मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने,त्याने खर्डा येथील किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी ताबडतोब खर्डा किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला होणारा अन्नधान्य आणि पाण्याचा पुरवठा खंडित करुन तटबंदीभोवती भडीमारासाठी तोफा रचल्या. शेवटी भयग्रस्त निजामाने १३ मार्च, इ.स. १७९५ रोजी तहाची याचना करुन लढाईतून माघार घेतली. खर्डा येथेच दिनांक १३ मार्च, इ.स. १७९५ रोजी पेशवे आणि निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या तहाने या लढाईची सांगता झाली. तहानुसार निजामाने मराठ्यांना पाच कोटी रूपये थकलेल्या चौथाई आणि युद्धखंडणीपोटी देण्याचे मान्य केले. स्वत:च्या ताब्यातील एक तृतीयांश प्रदेश मराठ्यांच्या स्वाधीन केला. दौलताबादचा किल्ला व त्याच्यासभोवतालचा प्रदेश पेशव्याला देण्यात आला. वऱ्हाडचा प्रदेश महसूलासहित नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला...

Comments

Popular posts from this blog

पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक!

कलावंतीन महाल भातोडी